वैचारिक,ललित साहित्याचे प्रकार व वैशिष्ट्ये

Books on the image with marathi text


Table Of Contain

आपले विचार,भावना,कल्पना इत्यादींचे आपण लेखन करतो किंवा आपल्या विचारांना आपण लिपीबद्ध करतो.यालाच आपण लेखन म्हणतो.हे एक भाषिक कौशल्य आहे.लेखनाला व्याकरणीक अशी नियमांची चौक असते.लेखन करत असतांना किंवा त्या पूर्वी आपण मानसिक चिंतन करीत असतो,ही एक प्रकारची विचार निर्मितीची प्रक्रिया असते. यात आपण आपल्याला पटलेले वा न पटलेलेही विचार व्यक्त करू शकतो. किंवा इतरांचे विचार,मतेही आपण विचार प्रतिपादनात घेऊ शकतो.

साहित्य हा खूप व्यापक विषय आहे पण इथे आपण भाषेच्या कार्यामागील व वापरामागील हेतूवरून ललित व वैचारिक लेखन असे जे दोन प्रकार मानता येतात असे ललित साहित्य प्रकार व त्यांची वैशिष्ट्ये आपल्याला बघायची आहे.

 वैचारिक लेखनाचे स्वरूप व प्रकार

वैचारिक स्वरूपाच्या लेखनात लेखक हा लोकसत्ताक समाजव्यवस्थेत वैचारिक स्वातंत्र्याच्या माध्यमातून स्वतःचे विचार मांडत असतो.या विचार प्रकटिकरणातून कधी तो इतरांचे विचार ग्रहण करतो किंवा कधी त्या विचारांना सभ्यपणे मतभेद देखील व्यक्त करत असतो.भाषेद्वारे जेव्हा आपण एखाद्या व्यक्ती,वस्तू,स्तिथीविषयी किंवा इतर कुठल्याही विषयांवर विचार प्रकट करतो,त्या विचारांमधून आपण आपले ज्ञान,अभिरुची,आपली जीवनधारणा,नैतिक भूमिका,आपले व्यक्तिमत्त्व देखील प्रकट करत असतो.

एखाद्या विषयांवरील इतरांच्या मतांना मांडत जात त्यातील उणिवा,त्रुटी दर्शवत स्वतःचे विचार युक्तिवाद कौशल्याने पूरक उदाहरणे,संदर्भ देऊन पटवून देणे अशीही एक पद्धत वैचारिक लेखनात आहे.ज्याला खंडन मंडन असे म्हणतात.

तर्कशुद्ध निष्कर्ष काढून,विषय विवेचन करत साहित्य व कला समीक्षा,वर्तमानपत्रे, ग्रंथ,संशोधन,पाहणी अहवालाचे निष्कर्ष इत्यादी क्षेत्रात वैचारिक लेखन केले जाते. सामान्यतः न्याय व्यवस्था,कलामुल्य मापन,अध्यात्म,वर्तमानपत्र,संस्कृती-इतिहास मीमांसा,तत्वज्ञानात्मक ग्रंथ या क्षेत्रात मोठया प्रमाणात वैचारिक लेखन होत असते.


अग्रलेख 

नियतकालिके वा वर्तमानपत्र यांच्या संपादकांनी लिहलेल्या संपादकीय लेखाला अग्रलेख म्हणतात.जागृती, लोकशिक्षण,जाणीव या प्रेरणेतून हे लेख लिहिले जातात. सद्यस्थितीतील प्रश्न, समस्या,घटना,व्यक्तीच्या कृती अशा विविध जीवनक्षेत्रासंबंधित विषयांवर अग्रलेखातून ठराविक शब्दात विचार मांडल्या जातो.सामान्य माणसाला जागे करणे व विधायक कृतिसाठी प्रेरित करणे हे अग्रलेखाचे उद्दिष्ट असते.संपादकीय लेखणाचे मूळ कार्य हे वर्तमानातील सामाजिक,राजकीय परिस्थितींवर भाष्य करणे असते.अलीकडच्या काळात जवळपास सर्वच राजकीय पक्षांचे मुखपृष्ठ असलेले स्वतंत्र असे वर्तमानपत्र आहे.त्यामुळे अग्रलेखातील निष्पक्षपणा(जो असायलाच हवा) वाचायला मिळत नाही.अग्रलेखातील भूमिका ही त्या वर्तमानपत्राची अधिकृत भूमिका असते.

वैचारिक निबंध लेखन :-

आपल्या विचारांची सुसूत्र,तर्कशुद्ध मांडणी वैचारिक निबंध लेखनात केली जाते.हा गांभीर्यपूर्वक लिहलेला तसेच समाजाला उपयुक्त असे विचार,दृष्टिकोन मांडत असतो.निबंध या साहित्य प्रकाराचा उदय विचारप्रतिपादन करण्यासाठी झाला आहे.विचार अनुभूती किंवा कल्पनांची,मुद्यांची सुसूत्र बांधणी येथे अभिप्रेत आहे.निबंध एक प्रकारे सौंदर्यपूर्ण रचनेशी संबंधित आहे.ही रचना विचार,विषय,कल्पना,विषय विश्लेषण यांची असू शकेल.मराठी शब्दकोशात 'निबंध म्हणजे =प्रबंध,नियमबद्ध असणारा लेख,मोठा लेख,नीटपणे पक्का जडलेला लेख' असा अर्थ दिलेला आहे.


स्फुट लेखन

एखाद्या विशिष्ट विषयावर समकालीन संदर्भ देत लिहलेला वर्तमानपत्रातील लेख.यात वैचारिक गांभीर्य राहीलच असे नाही.मनमोकळेपणाने विषय विषयांतरे, विषय वाढवीत नेणे असे करीत एखादा नवा विचार,माहिती चिंतानफल मांडलेले असावे लागते.मर्यादित शब्दात सुत्ररूपाने,संक्षेपाने असे लेखन केले जाते.लेखनात मृत्यू लेख व वैचारिक लेख असे प्रकार देखील आहे.


ललित साहित्याचे प्रकार

प्रथम आपण बघू ललित साहित्य म्हणजे काय

ललित शब्दाचा अर्थ 'सौंदर्य' 'सुरेख' 'मनमोहक' असा आहे.मनाला आनंद देणारे सौंदर्यतत्व या शब्दांमधून सूचित होते.लेखक हे लालित्य भाषेद्वारे निर्माण करीत असतो.आलंकारिक शब्दरचनेतून रसात्मक अनुभव वाचकांंना करून दिल्या जातो.लेखक प्रत्यक्षातल्या माणसावरून,अनुभवावरून कल्पनेच्या साहाय्याने पात्र निर्माण करतो.ती निर्मिती प्रतिभासिक निर्मिती असते. तात्पर्य. प्रत्यक्षातल्या जीवनाचे कल्पनापूर्ण निर्मितीत परिवर्तन घडविण्याची क्रिया म्हणजे साहित्यनिर्मिती होय.

गोष्ट / कथा आणि लघुकथा

गोष्ट हा लोककथेचा एक प्रकार मानावा लागेल.निसर्ग घटकांच्या,माणसांच्या,प्राणांच्या जीवनातल्या घटनांच्या आधारे गोष्ट रचली जाते.गोष्टी या बहुदा रंजन वा उपदेश करणे या प्रेरणेतून निर्माण होतात.

जेव्हापासून मानवाला बोलण्याची कला अवगत झाली तेव्हापासून एकमेकांना गोष्टी सांगण्याची कला ही विकसित झाली.पूर्वी या गोष्टी प्राण्यांच्या(इसापनीती)वैगरे असत.नंतरच्या काळात लोकजीवणाचा व लोकव्यवहाराच्या अनुभवावर आधारित अशा कथा एकमेकांना सांगण्यात येत असत.या कथांमध्ये सांगण्याचे कौशल्य, उत्कंठा,व आकर्षकपणा असे त्यामुळे कथा रंजक बनत असे आणि एकमेकांच्या कथा लोक आवडीने ऐकत असत.विकासाच्या ओघात हळूहळू लिपीचा शोध लागला त्यानंतर लिहिण्याची कथा अस्तित्वात आली.शिलालेख कोरले गेले ताम्रपट व भूर्ज पत्रावर लेखन केले गेले.त्यानंतर कागदाचा शोध लागला. त्यानंतर मुद्रण कलेचा शोध लागला.

मुद्रणकलेच्या शोधानंतर कथा लिखित स्वरूपात साकार झाली आणि वाङ्मय प्रकारात एक महत्त्वाचा प्रकार म्हणून लोकप्रिय ठरली.लघुकथेत मोजकी पात्रे,घटना,प्रसंग यांच्या आधारे जीवनाचे अंगदर्शन घडते.कल्पित माणसे,निसर्ग घटक ही लघुकथेतील पात्रे असतात.कवितेनंतर प्रचंड लोकप्रिय असलेला हा दुसरा साहित्य प्रकार आहे.


आत्मकथन,ललित निबंध,कविता व प्रवासवर्णन

आत्मकथा/बायोग्राफी

स्वतःला अभिव्यक्त करण्याच्या ओढीतून आत्मकथन हा साहित्य प्रकार अस्तित्वात आला आहे. स्वतःच्या जीवनातल्या घटना ,भेटलेल्या व्यक्ती,घेतलेले अनुभव, आपल्या भावना याचे स्वतः केलेले कथन म्हणजे आत्मकथा.

आत्मचरित्राच्या वाचकाला नेहमी यशस्वी लोकांच्या आत्मकथेत रस असतो.उद्योगपती,साहित्यिक,मोठा राजकीय नेता,सिलेब्रिटी अभिनेता-अभिनेत्री,सामाजिक कार्यकर्ता,वरिष्ठ पत्रकार,IS/IPS अधिकारी अशा लोकांच्या जीवनातील घटना,त्यांचा अनुभव जाणून घेण्यासाठी आत्मचरित्र वाचल्या जाते.जगभरातील कित्येक मोठया व्यक्तीचें अनुवादित बायोग्राफी आपल्याला आज उपलब्ध आहे.

मराठी साहित्यातील 'आत्मचरित्रा'ला खऱ्या अर्थाने दलित साहित्यिकांच्या आत्मकथनाने समृद्ध केले.दया पवार लिखित 'बलुत' या आत्मकथेने देशातीलच नव्हे तर विदेशातील शोषित-पीडितांना देखील 'आत्मकथा' लिहिण्यास प्रोत्साहित केले.


ललित निबंध

वैचारिक निबंधापेक्षा ललित निबंधाचे स्वरूप वेगळे असते.यात एखादे व्यक्ती चित्र,एखादी घटना,एखादा अनुभव किंवा एखादा क्षण असे काहीही स्व केंद्री भूमिकेतून कथन करणे ही एक रीत आहे.'स्व' ने केलेले चिंतन,'स्व' च्या आठवणी,'स्व' च्या भावावस्था याचे दर्शन ललित निबंधातून घडते.लालित्यपूर्ण चिंतनप्रक्रिया हे याचे वैशिष्ट्य सांगता येईल.विषयाचे बंधन वा मांडणीची शिस्त असे काही न पाळणारा हा मुक्त लेखन प्रकार आहे.अनुभव,घटना किंवा व्यक्तींकडे पाहण्याची दृष्टी ही लेखकाची खास व्यक्तिगत दृष्टी असते म्हणून ललित निबंधाला विविधताही प्राप्त होऊ शकते. घटना-व्यक्ती यांचा विशिष्ट कालानुक्रम गृहीत धरून 'मी' जेव्हा बोलू लागतो तेव्हा त्या बोलण्याला कथनपरता प्राप्त होते व एखादी हकीगतही ल.निबंधात सामावली जाऊ शकते.सोंदर्ययुक्त मूल्यदृष्टीने जीवनानुभव घेणारा 'मी' ललित निबंधातून प्रकट होत असतो.सर्व मानवीमनाचे - स्वभावाचे सर्व रंग प्रकट करण्याचे सामर्थ्य ललित निबंधात असते.


कविता

कविता हा भावनेला महत्व देणारा साहित्य प्रकार आहे.कवीच्या भावनात्मकतेचे सहज,उत्कट व प्रत्ययकारी संक्रमण वाचकांमध्ये होणे आवश्यक मानले जाते. कवीला भावनात्मक अनुभवाची तीव्र, उत्कट अशा अविष्काराची ओढ असते.त्यातूनच तो काव्यशब्द,काव्यभाषा घडवतो.कवितेत भाषिक मोडतोड मोठ्या प्रमाणावर होते,त्यामागे कवीचा सौंदर्यसर्जनाचा हेतू असतो.व्यवहारभाषेची परंपरागत नियमव्यवस्था, संकेतव्यवस्था मोडली गेल्याने वाचक किंवा श्रोता मूळच्या संकेतव्यवस्थेचे स्मरण ठेवीत कविनिर्मित नव्या व्यवस्थेकडे आकर्षित होतो.भाषेच्या लयींचा,नादगुणांचा,दृश्यागुणांचा,दृश्यात्मकतेचा सूचक वापरही कवी करत असतो. भाषेच्या गद्य साहित्य प्रकारांमध्ये भाषा हे बहुदा माध्यम व साधन म्हणून कार्य करते.परंतु कवितेत भाषा हे भावसंप्रेषणाचे माध्यम बनते.


प्रवास वर्णन

प्रवासवर्णनामध्ये प्रवासात भेटलेल्या व्यक्ती,त्या व्यक्तींचे गुण वैशिष्ट्ये,प्रवासात आलेले संमिश्र अनुभव,ज्या ठिकाणी प्रवास घडला त्या ठिकाणचा भूगोल,इतिहास,लोकांच्या रितिभाती,लोकजीवन,स्थळ वैशिष्ट्ये या सर्वांचाच समावेश असावा लागतो.या सर्व गोष्टींची शब्दाच्या माध्यमातून पुर्नरचना प्रवासवर्णनकारास करावी लागते.तेव्हाच ते ललितरुप धारण करते.नाहीतर ते रुक्ष प्रवासवृत ठरू शकते.प्रवासातील कोणत्या घटना,व्यक्ती,प्रदेश व त्यांच्या अनुभूतीचे दर्शन घडवायचे. हे लेखकाने ठरविलेले असते.'निवड' हे तत्व येथे असते.कारण 'काय सांगायचे?' हा लेखकाचा कलामुल्याशी निगडित प्रश्न आहे.भाषिक निवडीएतकीच आशयाची निवड महत्वाची असते.या निवडीमधून 'वर्णन' ही कलात्मक ठरते.प्रवासवर्णन हे केवळ 'वर्णन' असत नाही त्यात संवाद,कथन,भाष्ये यांचाही यथोचित वापर लेखकाने केलेला असतो.भाषिक सर्जनशीलता प्रकट करणारी प्रवासवर्णने ही उत्कट प्रत्ययकारकता निर्माण करतात. असा लेखक वाचकाला आपल्या अनुभवात सहभागी करून घेतो.त्यामुळे भावनिक व सौंदर्यात्मक संक्रमण घडून येते.मराठीत 'पूर्वरंग व 'अपूर्वाई हे पु. ल. देशपांडेंची प्रवासवर्णने सुंदर उदाहरण आहे.

हे काही प्रमुख प्रकार ललित साहित्यात आहे.या व्यतिरिक्त रुपककथा,लोककथा,दृष्टांत कथा हेही ललित साहित्याचा भाग आहे.